मोकळ आकाश ...... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)
“कुणा कुणाला बंधनमुक्त राहायला आवडेल” असा प्रश्न जर विचारला तर माझ्या मते कुणीही ‘मला आवडणार नाही’ असे उत्तर
देणार नाही. बरोबर आहे ना! त्याही पुढे जाऊन “मी स्वतंत्रच आहे” असे उत्तर देणारेही कमी भेटणार नाही.
काल नवीन वर्षाची सुरुवात झाली. खूप सारे
शुभेच्छा संदेश आले व्हाटस ऍप वर. काही शुभेच्छा संदेश नवीन संकल्प करा या आशयाचे
होते. यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणार संदेश होता देवळाली केंद्रीय
विद्यालयामध्ये काम करणाऱ्या श्री. धनंजय पारकर सरांचा. पारकर सरांचा आणि माझा
परिचय काही फार जुना नाही. पण जिव्हाळा मात्र तयार झाला तोही एकाच वर्षात.
त्यांच्या विद्यालयात मी सिनिअर सुप्रीटेंडंट म्हणून सी.बी.एस.सी. बोर्डची परीक्षा
घ्यायला गेलो होतो. म्हणून झाला हा परिचय. एकाच वर्ष झाले भेटीला, पण ती खोलवर रुजली. ती भविष्यात अशीच बहरेल अशी आशा
आहे. त्याचे कारण एकच आम्हाला दोघानाही दोघांकडूनही काहीच अपेक्षा नाहीत. तर त्या
शुभेच्छा संदेशामध्ये नवीन वर्षामध्ये काय संकल्प करावा यावर ओशोंनी केलेलं भाष्य
पारकर सरांनी मला पाठवले होते. अशोंच्या मते “काहीच संकल्प करू नका” काहीतरी संकल्प करायचा याचा अर्थ पारतंत्र्यात जायचे. कारण
आपण आपल्या मनाभोवती या पद्धतीने काहीतरी कुंपणे टाकतो... आणि मग सुरु होतो त्या
कुंपणा मध्ये घुसमटनारा प्रवास..... बर्याच गोष्टी कराव्याशा वाटतात. पण संकल्प
केलाय ना! मग मन मारून जगणे आले. आणि एक दिवस येतो आणि तो संकल्प तुटतो. मग मनाची
अगतिकता समोर येते. एवढे दिवस संकल्प टिकवून तरी काय फायदा झाला. त्यापेक्षा
संकल्पच करू नका ना! कशाला गोठवायचे मन....... वा! संकल्पच न करण्याचा संकल्प केलाय
मी या वर्षी. कमी अधिक फरकाने तुम्हा सर्वांच्या बाबतीतही हेच घास्डत असते का?
बघा.... मला वाटते घडत असणार. असो..... हे झाले संकल्पाच्या बाबतीत. संकल्प म्हणजे
नियम केला आपण आपल्या स्वतःसाठी..... बरोबर? म्हणजे या नियमाच्या बाहेर वागायचे
नाही. पण एक्सेप्शनल केसेस मध्ये नियम मोडला तर चालतो. म्हणजे आपण स्वतःला
स्वतःच्याच हाताने बांधून टाकतो. आहात न सहमत माझ्याशी...... मग आपण स्वतंत्र कसे?
आज प्रत्येक माणसाने कोणत्या न कोण्या प्रकारे स्वतःला बांधून घेतलेय... हो! खर
बोलतोय मी..... म्हणजे मी अमुक पक्षाचा.... म्हणजेच पक्षाची संहिता मी पाळली
पाहिजे (अडकले)....... मी अमुक एक धर्माचा.... म्हणजे धर्माची संहिता पाळली
पाहिजे. भले ती लादलेली का असेना. (बरोबर ना!..... अडकले पुन्हा एकदा..) बहुतेकांच्या
बाबतीत तर धर्म .... जात या गोष्टी ओघाने, अनुवंशिकतेने आलेल्या असतात.आणि आपण
सगळे या गोतावळ्यात जळमटाप्रमाणे संपूर्ण आयुष्य गुरफटून टाकतो. त्या जाळ्यात एकदा
का अडकले कि पुन्हा सुटका नाही...... आयुष्यभर आपण, स्वीकारलेल्या संहितेच्या
संकल्पनांवर विचार सुद्धा करत नाही. याचीही कारणे आहेत.... धर्मशास्रावर संशय घेणे
हे सुद्धा पापच आहे. असा अजून एक प्रचलित सिद्धात.मग काय आहे तेच नियम काटेकोरपणे
पाळायचे. त्या नियमांच्या बाहेर काही वर्तन झाल्यास ‘पाप’ केल्याचा अपराध मनात
ठेऊन आयुष्य कुंठायचे..... असा संपूर्ण खेळ जीवनभर चालू राहतो.....
समाजात अशा अपराधी भावनेने जगणार्यांची संख्या
काही कमी सापडणार नाही. म्हणून तर आत्मिक शुद्धीसाठी गंगातिरी आणि गोदातीरी इतक्या
मोठ्या रांगा लागत असतील ना.... हे काही फक्त गंगा किंवा गोदावरीचे चित्र नाही. मस्जीदिमध्ये
असो वा चर्च मध्ये प्रायःश्चीतापोटी मोठी रक्कम देणार्यांची संख्या काही कमी
नाही.. बर एवढ करूनही आपण पापमुक्त झालोय का याची काहीच खात्री नाही..... म्हणूनच
अशा साठत गेलेल्या पापांची मरते वेळी भीती वाटू लागते आणि माणसे मरताना रडू
लागतात. खर तर जगण्याचे अंतिम सत्यच जर मरण हे आहे. मग ते जवळ आल्यावर आनंदोत्सव
साजरा करण्याचे सोडून हे रडत का असतील? असा प्रश्न मला नेहमी पडतो.
म्हणजे बघा नां....... आपण एखाद्या प्रवासासाठी निघालो, अ पासून ब पर्यंत
जायचंय, मग ब पर्यंत पोहोचल्यावर आपण आनंदोत्सव साजरा करायला हवा. किंवा आपण सुखरूप
पोहोचलो, आपल्याला प्रवास अर्ध्यावर सोडवा नाही लागला याचे समाधान व्यक्त करायला
हवे. बरोबर ना!.....अर्थातच आनंद व्हायला
हवा. मग अ म्हणजे जन्म, सुरुवात आणि ब म्हणजे मरण किंवा प्रवासाचा शेवट असे गृहीत
धरले तर आपण हा प्रवास पूर्ण केल्याचा आनंद व्हायला हवा. बरोबर! ..... पण लोक रडत
का असतील?... शोधूयात का?... मला या मागे काही कारणे दिसतात. बहुधा हा प्रवास
खिलाडू वृत्तीने पूर्ण केला नसावा. त्यामुळे विजयाचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर
दिसत नाही. हरण्यापेक्षा कुमार्गाने/ चुकीच्या पद्धतीने मिळवलेली विजयश्री जास्त
टोचते. आणि हे सर्व कुठेतरी सद्सद्विवेकबुद्धीला पटत नाही. कारण तुम्ही बाह्य
जगाशी, आपल्या माणसांशी, सभांमध्ये हे सर्व पटवून देऊ शकता किंवा त्या प्रकारचे
भास तयार करू शकता कि तुम्ही कसे बरोबर
होतात किंवा आहात. पण तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीशी तुम्ही प्रतारणा नाही करू
शकत....कुणीच नाही करू शकत. मग हेच शल्य आयुष्यभर वाढत जात असावे आणि मरण जवळ
आल्यावर टोचत असावीत. स्वच्छ/ शुभ्र, निरभ्र, निर्भेळ विजयश्रीचा आनंद ती सल आपल्याला आपल्याला मिळू देत नाही. आणि
आपण दुःखी होतो/ कष्टी होतो / रडवेले होतो.
दुसरे एक कारण असण्याची शक्यता अशी आहे कि कदाचित लोकांच्या मोह, असूया, काही
सुटत नाही.. जगामध्ये कायम, अविनाशी, pernmanent असे काहीच नाही हे माहित असून सुद्धा बर्याच
गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. जे दुःखाचे कारण बनत असावे. म्हणजे बघा न, एक नवी
कोरी गाडी (मोटारसायकल किंवा चारचाकी) घेतली कि साधारण वीस वर्षांनी ती कालातीत होणार
आहे, असे माहित असूनही आपण ती गाडी कालातीत झाली म्हणून दुःख करणार असू तर त्याल
काय म्हणावे?....
यामागचे तीसरे कारण नियम मोडले म्हणून असेल कदाचित. नियम म्हणजे धर्म, समाज,
चालीरिती यांचे नियम. म्हणा. त्यामागची अपराधी भावना ..... मरणानंतर देवाला उत्तर
द्यावे लागेल, याची भीती...... पण मग नियम तरी कुठे एकसारखे आहेत सर्वांचे? एका
धर्मात एकद्शीच्या दिवशी मटन खाल्ले तर पाप, तर दुसर्या धर्मात त्याच दिवशी ईद
नेहमी येते. एका पंथात मद्य पिणे म्हणजे अपराध, तर दुसर्या धर्मात तेच मद्य देवाला
अर्पिले जाते. सामान्य माणूस मात्र या सर्व जन्जालामध्ये इतका गुरफटून जातो कि
त्याच्या चेहऱ्यावरील तेज गायब होऊन अपराधांच्या गडद काळ्या डागांची संख्या मात्र
वाढत जाते. आणि शेवटी रडकुंडीस येतात.
या सगळ्यापेक्षा मी निसर्गाने घडवलेली एक प्रतिकृती आहे. निसर्गाने ठरवून
दिलेले नियम हेच माझे नियम आहेत असे गृहीत धरून जीवन व्यतीत केले तर! कशाला
जल्मातांमध्ये अडकायचे आणि अडगळीत पडायचे. .... निसर्गाचा एकाच नियम आहे.. “ओरबाडू नका” बस्स. बाकी काहीच नाही.जे तुमच्या वाट्याला आहे त्यावर तुमचा हक्क आहेच आहे....
दुसर्याच्या वाट्याचे ओरबाडू नका. हा.... तो स्वेच्छेने देत असेल तर हरकत नाही.
बरोबर ना...... म्हणजे पहा तुमची पूर्तता झाल्यावर दुसऱ्याला देण्यामध्ये
तुम्हालाही आनंद होतोच ना. तसाच त्यालाही होईल. आनंद दोघांनाही होईल. आणि ज्या
गोष्टीमुळे आनंद निर्माण होतो, तीच तर आहे पुण्याईची परिभाषा. ज्या गोष्टीमुळे
दुःख निर्माण होते/ अर्थातच ओरबाडण्याच्याच्या वृत्तीने, हि आहे पापाची परिभाषा. पटतंय
का तुम्हाला?.......
कोणत्याही खेळात जास्त नियम असले कि अपघात होतात. आणि कोणताही खेळाडू सर्व
नियम लक्षात ठेवत, ठेवत खेळू लागला तर स्वच्छ्न्दीपणे खेळू शकत नाही.... आपण कमीत
कमी नियम बनवले तर जीवन नक्कीच संगीतमय, आनंदमय होईल. आणि अपघाताची, चुकांची
शक्यता राहणार नाही. सर्व नियम लक्षात ठेवण्याचीही गरज नाही.
मग आपल्या साध्यापर्यंत पोहोचल्यावर असणारा चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच द्विगुणीत
करणारा असेल आणि आजूबाजूच्या लोकांनाही स्फूर्तीदायी ठरेल. कारण विरमरण हे नेहमीच
स्फूर्तीदायी असते. त्याहीपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील समाधान लोकांना जगण्याची नवी
उर्मी देईल आणि तुम्ही बनाल एक ‘रोल
मोडेल’ आदर्श व्यक्तिमत्त्व.
इति संपूर्णम....... निघतोय पुढच्या बिंदू च्या शोधात. (२.१.२०१६)
No comments:
Post a Comment