Tuesday, January 19, 2016

पिंपळाच झाड ....... सांगाती


पिंपळाचे झाड....... डॉं. आविनाश लांडगे (सांगाती)
भटकती हा माझा आवडता छंद. लहानपणी वडिलांच्या धाकामुळे मी कधीच बाहेर पडत नसे. एक दोनदा प्रयत्न केला होता, पण नंतर खूप मरे खावा लागला होता. वडील खूप तापट स्वभावाचे असल्याने, त्यांना राग आल्यावर स्वतावरचा ताबा सुटत असे. मग मात्र काय होईल याची कोणालाच शाश्वती नसे. मी असा मार अनेक वेळा खाल्ला आहे. त्यांचा राग शांत झाल्यावर त्यांना त्याचा पश्चाताप होई आणि मग वडिलांना रडू अनावर होई व ते दूर शेतात जाऊन एकटेच रडत बसत.कित्येकदा मी त्यांचे अश्रू पुसून त्यांना घरी घेऊन आलो आहे. मोठा झाल्यावर मात्र फोटोग्राफीच्या निमित्ताने माझी भटकंतीची पुरेपूर हौस झाली. एकतर फिरायला मोटारसायकल मिळत असे. जेवणासाठी पैसे आणि पगार वेगळा. शिवाय लग्नसराई नेहमी उन्हाळ्याची सुटी किंवा दिवाळीची सुट्टीत असल्याने कॉलेज ला दांडी मारण्याचा प्रश्न येत नसे. मी खूप भटकलो, निरनिराळे प्रदेश पाहिले. तेथील लोक पाहिले. चालीरीती बघितल्या, लोकालोकांमधील द्वेष, मत्सर अनुभवले.
     कथाकथनाच्या निमित्ताने पिंपळाच्या झाडाची कथा सुचली. सुचली म्हणण्यापेक्षा मी ती कुठेतरी वाचली किंवा पहिली असण्याची शक्यता जास्त आहे. पण ती कथा मात्र मी गुंफली. कॉलेज जीवनात चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्या आम्हाला खूप आवडायच्या.बर्याचशा तर माझ्या तोंडपाठ झाल्या होत्या.त्या चारोळ्यांची मदत मी कथाकथनात घ्यायचे ठरवले आणि मनाशी एक कथा गुंफली. मी आजपर्यंत कोणतेच भाषण कधीच लोहून काढले नाही.जसे असेल तसे समोरच्या लोकांबरोबर संवाद साधायचा हे आधीपासूनच ठरलेले.
कथाकथनाच्या दिवशी वैजापूर येथे लग्नात भेटलेल्या त्या लहान बाळाचे दादा-दादा, दादा-दादाचे स्वर माझ्या कानात गुंजत होते आणि त्या निरागस बलाचा चेहरा सारखा नजरेसमोर फिरत होता.बिडीच्या वेळी अश्रूंनी डबडबलेला चेहरा विसरणे शक्यच नव्हते.
कथाकथनासाठी  उभा राहिलो, आणि मी कथेला प्रारंभ केला........ स्वातंत्र्यापूर्वीचे गाव, ज्या गावात अस्पृश्यता अगदी टोकाची पाळली जात होती. अगदी अस्पृश्यांची सावलीसुद्धा अंगावर पडू द्यायची नाही इतकी ती पाळली जात असे. तेव्हा गावात एकत्र बसने, एकत्र जेवणे या गोष्टी फारच दूर राहिल्या. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत या अस्पृश्यांचा सहभाग नसे. असह प्रकारचे दुर्लक्षित जगणे काय कामाचे असा विचार कित्येकांच्या मनात येई. पण कधीतरी हि परिस्थिती बदलेल या आशेवर दिवस ढकलणे चालू होते. जगण्यासाठी माणूस किती टोकाला जाऊ शकतो याची अनेक उदाहरणे त्या गावात बघायला मिळत होती. चोर्या करणे हा किरकोळ विषय होता. पण एखादे जनावर मेल्यावर या क्षुद्र लोकांना बोलावले जात असे. त्या जनावराची कातडी काढण्यापासून तर मेलेल्या जनावराचे मांस खारवून (मीठ लावून ठेवणे) पर्यंत सर्व कामे हि मंडळी गरजेपोटी करत असत. जेव्हा केव्हा अन्न उपलब्ध नसेल, तेव्हा तेव्हा हे खारवलेले मांस पोटाची, मुलाबाळांची पोटाची खळगी भरण्यासाठी उपयोगात आणले जात असे कारण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नसे.
आपल्या कहाणीचा नायक म्हादू. हासुद्धा या सर्वांपैकीच एक. चार वर्षांपूर्वी म्हादुच लग्न झाले. दुर्दैवाने त्याची बायको दोन वर्षातच एक तांह बाळ म्हादुच्या पदरात टाकून मरण पावली. खूप रडला म्हादू त्यावेळी. जीवापाड जपायचा तो आपल्या बायकोला.कारण लहानपणापासूनच अनाथ असल्याचे दुःख त्याने भोगले होते. प्रमानिक्पानाच्या जोरावर गावातील लोकांची मर्जी सांभाळत त्याने गावात स्वताची किंमत तयार केली होती. किंमत ती काय म्हणा, म्हादू सांगितलेल्या कामाला कधीच नाही म्हणत नाही, त्याच्या अंगी प्रामाणिकपणा आहे, बिचारा कधी चोर्या चकार्या करत नाही. हेच ते काय त्याच्या किमतीचे लेबल. अर्थात याच एका किमतीच्या लेबल्साठी गरीब माणूस आयुष्यभर झटत असतो......... बायको गेल्यावर दुसर्या लग्नाचे प्रस्ताव म्हादुकडे आले पण त्याने स्पष्ट नकार दिला. पदरात पडलेल्या बाळाचा प्राणपणाने सांभाळ करायचा असे म्हदुने ठरवले. दुर्दैव काही त्याची पाठ सोडेना. आणखी वर्षभरातच त्याच हिरमोड झाला. बाळ मतीमंद निघाले. बाळाला नीट बोलता येत नव्हते कि चालताही येत नव्हते. या बाळाची आई आणि वडील अशा दोघीही जबाबदार्या म्हादुच पार पाडत होता. आता तर ते बाळच म्हादबाच सर्व विश्व होते. त्याने आपल्या बाळाचे नाव पिऱ्या ठेवले. पिऱ्या दोनच शब्द बोलू शकत होता. बाबा- बाबा, बाबा-बाबा. तेवढ्या दोन शब्दांमध्येच पिर्याचे विश्व समावलेले होते. जसजसा पिऱ्या मोठा होत होता, तसतसा तो फक्त बाबा- बाबा चे बोल तेवढे स्पष्ट उच्चारू लागला. बाकी पिऱ्या कधी काहीच बोलला नाही. म्हादबसाठी पिर्याच्या तोंडचे तोंडचे बाबा-बाबा हे शब्द अमृताहूनही गोड होते. प्रत्येक बापाला ते असतात तसे. येथे उच्च- नीच, स्पृश्य-अस्पृश्य माणूस- जनावर असा भेद निसर्ग कधीच करत नाही. या बाबा शब्दांभोवातीच म्हादबा व पिर्याचे आयुष्य गुंफलेले होते. पिर्याच्या सर्व ओर्डर बाबा बाबा या दोन शब्दांवर भागवली जात असे. फक्त म्हादबाच त्या शब्दांचा अर्थ लावू शकत होता. पिर्याची अंघोळ, तहान-भूक सर्व काही या दोन शब्दांत म्हादबाला काळात असे. हे सर्व म्हादबा अगदी आनंदाने अविश्रांत करीत असे.
एकदा का दुर्दैवाने तुमचा पिच्छा पुरवला कि ते सहजासहजी तुम्हाला सोडत नाही. बर्याचदा आयुष्य पूर्ण उध्वस्त करून टाकते.......... त्याचवेळी गावात अस्पृश्यामध्ये चळवळीचे वारे वाहू लागले. अस्पृश्य समाजात आपण अस्पृश्य असलो तरी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. अशी कुणकुण सुरु झाली. आम्हालाही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्या, वगैरे वगैरे.. अशा म्हण्या जोर धरू लागल्या. या मागणीसाठी गावातील वातावरण बिथरले. उच्च जातीचे लोक या सगळ्यासाठी तयार नव्हते. बरेच दिवस वातावरण धुमसत राहिले.कुणीच काही निर्णय घेण्याप्रात येईना. विचारांची ढकलाढकली चालूच होती. अचानक एके दिवशी अस्पृश्यांनी उठाव केला कि यापुढे आम्ही स्पृश्यांची क्न्तीही कामे करणार नाही. भुकेने मेलो तरीही बेहत्तर पण आता माघार नाही. आम्हालाही तुमच्यासारखे जगायचे आहे.... आम्हीसुद्धा माणसंच आहोत.... तुमच्या पंक्तीत बसायचे आहे....... मंदिरात प्रवेश करायचा आहे. तुमच्या पाणवठ्यावरील पाण्याची चव चाखायची आहे.... नायतर आम्ही कोणतीच कामे करणार नाही. मेलेली ढोरंही उचलणार नाही, आणि दगड ही फोडणार नाही आणि शेतात कामालाही येणार नाही. प्रश्नाने उग्र रूप धारण केले होते. कुठेतरी समन्वय घडवून आणणे गरजेचे होते. गावचे पाटील हे मायाळू वृत्तीचे होते. त्यांनी आधीच गावकर्यांना स्पृश्य अस्पृश्यता न पाळण्याबद्दल समजावले होते. पण कोणीही त्यांच्या बाजूने नसल्याने गाव करी ते राव काय करी’ त्यांचा नाईलाज झाला होता. आज मात्र सर्व गावकर्यांनी येऊन त्यांना हा जातील प्रश्न सोडवण्यासाठी साकडे घातले. प्रकरण फारच पेटले होते. गावकरी अस्पृश्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य करायस तयार नव्हते आणि अस्पृश्य सुद्धा आपल्या मागण्यांवर ठाम होते.
शेवटी पाटलांनी एका अटीवर मध्यस्ती करण्याचे मान्य करून ‘मी जो निर्णय देईल टी सर्वांनी मान्य करायला पाहिजे’ असे सांगितले. दोन्ही बाजूंना पाटलांचा आदर असल्याकारणाने होकार दिला. दोन्ही बाजूंनी पारडे तोलते ठेवणे गरजेचे होते. पाटलांनी गावात असलेल्या अस्पृश्यांपैकी प्रत्येक अस्पृश्याला वर्षातून एक दिवस उच्चवर्णीयांप्रमाणे व्यतीत करता येईल. असा निर्णय दिला. त्याला उच्च वर्णीयांच्या बैठकीत बसता येईल, त्यांच्यासारखे जीवन जगता येईल, असा निर्णय झाला. म्हणजे एक अस्पृश्य एका दिवसासाठी उच्चवर्णीय होणार. पण उच्चवर्णीयांनी एक अट टाकलीच.... अट अशी होती कि जो अस्पृश्य उच्चवर्णीय म्हणून जीवन जगेल त्याने त्या दिवशी उच्चवर्णीयांचे सर्व नियम पाळावयाचे. जसे सकाळी उठून डोक्यावरचे सर्व केस काढून सुगंधी पाण्याने अंघोळ घातली जाईल. सोवळे नेसून मंदिरा जावून त्याने देवाची यथासांग पूजा करावी नंतर सर्वांचे बरोबर पंक्तीत बसून जेवावे, त्याचबरोबर त्याने कोणत्याही अस्पृश्याला हात लावता कामा नये. नाहीतर तो बाटला जाईल. आणि गावाच्या पद्धतीनुसार त्याला सर्व उच्चवर्णीयांकडून जबर चोप दिला जाईल. वगैरे वगैरे...... सर्वानुमते हा निर्णय मान्य झाला. एकतर अपेक्षा नव्हतीच पण चला एक दिवस का होईना आपल्याला उच्चावार्नियांचे जिने जगायला मिळणार म्हणून प्रत्येक अस्पृश्य खुश होता. आपली पाळी कधी येईल, आपली वेळ आल्यावर आपण कसे वागू, काय काय करू, काय खाणार अशी स्वप्ने प्रत्येकजण रंगवत होता.
‘एकदा एका ओंडक्याला पालवी फुटली
त्यालाच कळेना जगण्याची  जिद्द कुठली.’
ठरल्याप्रमाणे गावातील एकेका अस्पृश्याचा सोडतीप्रमाणे दिवस येत होता, आणि तो अस्पृश्य उच्चवर्नियाचे जीवन जगण्याचा आनंद घेत होता. त्यांच्या पंक्तीत जेवत होता. मंदिरात जात होता उच्चवर्णीयांमध्ये मिसळत होता. त्याला कुणीही कमी लेखत नव्हते. स्वर्गसुखच म्हणा कि हे...... कारण जिवंतपणी मरणयातना भोगनार्यांसाठी हा एक दिवस स्वर्गासुखाबरोबरच होता.दिवसांमागून दिवस जात होते. प्रत्येक अस्पृश्य आपल्या दिवसाची वाट पाहत होता तसेच ज्यांचे उच्चवर्णीय म्हणून जीवन जागून झाले होते तो त्या दिवसाच्या आठवणी चघळत दिवस काढत जगात होता. इकडे म्हादबा व पिर्याचे आयुष्यही संथगतीने पुढे सरकत होते. इतरांप्रमाणे एक दिवस का होईना आपल्यालाही उच्च्वार्नियांप्रमाणे जीवन जगण्यास मिळेल या आशेने म्हादबाच्याही मनात आशेचे आकांक्षांचे धुमारे फुटत होते. त्या दिवशीचे स्वप्न रंगवत म्हद्बाचे दिवस जात होते. आणि एके दिवशी म्हादबाच्या नवे सोडत निघाली. म्हादबाला उद्या उच्चवर्णीय जीवन जगता येणार होते. तसे त्याला सांगण्यात आले.म्हादबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
म्हद्बाने लगेच दुसर्या दिवसाची तयारी सुरु केली. डोक्यावरचे केस कापले गेले. स्वच्छ दाढी घोतली. सकाळी सकाळी म्हादबाला अत्तराच्या पाण्याने अंघोळ घातली गेली. सोवळे नेसावयास देऊन मंदिरात मंत्रोच्चाराने त्याची शुद्धी करवून घेण्यात आली. आणि त्याला मंदिरात पूजा करण्यास परवानगी देण्यात आली.आज म्हादबा खूप खुश होता.त्या खुशीत त्याला पिर्याची थोडावेळ आठवणच पडली. आज तो आनंदात नुसता गावभर फिरत होता.आजचा दिवस उच्चवर्णीय असल्याचा किती अभिमान त्याला वाटत होता.सार्वजन त्याच्याशी अदबीने बोलत होते.त्याच्याशी गप्पा मारत होते. कोणताही अपमानाचा लवलेश दिसत नव्हता. खरच स्वर्गात असल्यासारखे वाटत होते हे सर्व.........
हे सर्व करता करता दुपारच्या जेवणाची वेळ येऊन ठेपली. आता म्हादबाला सर्व उच्च्वार्नियांबरोबर पंक्तीत बसून जेवायला मिळणार होते. एऱ्हवी उष्ट्या पत्रावळीवरील अन्न गोळा करावे लागणारा म्हादबा सर्वांच्या समवेत पंक्तीत जेवायला बसला.सर्व प्रकारचे पक्वान्न म्हादबाच्या ताटात वाढले गेले. अरे वा! जिलेबी, गुलाबजाम, वरण भात, अशी कितीतरी प्रकारची व्यंजने म्हादबाच्या ताटात आज ओसंडत होती. सर्व पंक्तीला वाढल्याबरोबर प्रार्थना सुरु झाली..
वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन हों नाम घ्या तुकाचे, अन्न हे परब्रम्ह जाणिजे यज्ञ कर्म, बोला पंढरीनाथ महाराज कि जय..... बसा.
बस म्हटल्याबरोबर सर्वांनी जेवणास सुरुवात केली. म्हादबाने त्याचे आवडते व्यंजन जिलेबी उचलली, तोंडात टाकणारच इतक्यात त्याच्या कानावर आवाज आला...... बाबा-बाबा! म्हादबाच्या हातातला घास तिथेच अडकला.पिर्याची आर्त हाक म्हद्बाचे काळीज चिरत गेली. कानात गरम गरम शिसे ओतल्याप्रमाणे टी आरोळी म्हादबाच्या कानात घुमत राहिली. मंदिराच्या ओट्यावर सर्वजन जेवणावळीचा आस्वाद घेत होते. सर्व उच्चवर्णीयांची पंगत बसलेली.. आणि समोरच्या पटांगणात रणरणत्या उन्हात. गरम फोफाट्यात बसून पिऱ्या म्हादबाला आवाज देत होता. बाबा-बाबा, बाबा-बाबा, ....
म्हादबाचे संपूर्ण शरीर त्या आर्त हाकेने घामाच्या धारांनी डबडबले, आता काय करायचे, असे वाटत होते कि असेच उठून पळत जावून पिर्याला उचलून छातीशी कवटाळावे, त्याचे भराभरा पापे घ्यावे, आज आपल्याला त्याची आठवण कशी झाली नाही, आज आपण एवढे स्वार्थी व कठोर कसे झालो या विचाराने त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली.त्याला आज सकाळपासून कोणीच अंघोळ घातली नसणार कि दूधही पाजले नसणार या जाणीवेने त्याचा जीव कासावीस झाला.त्याला खूप तहान लागली असणार, तो गरम फोफाट्यात बसून फक्त बाबा-बाबा म्हणत असला तरीही म्हादबाला हे काळात होते कि माझा पिऱ्या भुकेने व्याकूळ झाला आहे. कारण त्याची भाषा फक्त म्हद्बालाच काळात होती. म्हादबा आहे त्याच स्थितीत गोठून गेला, पण आता काय करायचे हे त्याला सुचत नव्हते. आज तो उच्चवर्णीय होता व त्याचे सर्व नियम पाळणे त्याला बंधनकारक होते. आणि पिऱ्या मात्र अस्पृश्य ! आज नियमाप्रमाणे म्हादबा पिर्याला स्पर्श करू शकत नव्हता, त्याच्याबरोबर राहू शकत नव्हता कि त्याला खाऊपिऊ घालू स्जाकात नव्हता. पिर्याला स्पर्श करणे हे म्हादबाला वर्ज्य होते.नाहीतर परिणाम भयंकर होते. म्हादबाचे जेवण तिथेच थांबले, चेहरा घामाने डबडबला. समोर पिर्याचा बाबा-बाबा चा जयघोष चालूच होता. गरम फोफाटयात  पिर्याला चटकेही बसत होते. सूर्य डोक्यावर आल्याने त्याची तीव्रता वाढतच होती. तसतशी पिर्याची बाबा-बाबा बाबा-बाबा ची आरोळीही क्षणागानिक वाढत होती, सोबतच म्हद्बाची तगमग.......
म्हद्बाचे मन कासावीस झाले.मनात भावनांचा कल्लोळ उठला. नको हे उच्चवर्णीय जगणे असे त्याला वाटून गेले. पण आता पर्याय नव्हता. काय करावे हे त्याला कळेना. पंक्तीतील बाकी लोकांची जेवणे झाली.काहींना म्हादाबाची ही स्थिती कळली तर काहींनी त्या दिवशी हे अस्पृश्य फार माजले होते त्याचं सूड आज घ्यायला मिळणार म्हणून ते मनोमन आनंदीही झाले होते. ते फक्त बघ्याची भूमिका घेऊन आनंद घेत होते.म्हादबाला मात्र आजूबाजूला जे काही चालले आहे याची काहीच कल्पना नव्हती. त्याला फक्त बाबा-बाबा या हाकेचा जयघोष ऐकू येत होता. त्या आवाजाने त्याच्या मनात एक काहूर माजले होते. त्या काहुराची तीव्रता इतकी वाढली की म्हादबाने सर्व बंधने तोडून तो तडक ताटावरून उठला, ताटाजवळील पाण्याचा तांब्या उचलला व पळत जावून त्याने पिर्याला त्या गरम फोफाटयातून उचलून घेऊन पाणी पाजले.पिर्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने हवेत आपले हात उंचावून तल्या पिटायला सुरुवात केली. म्हादबानेही आनंदाच्या भारत त्याचे पटापट मुके घेत आपले प्रेम व्यक्त केले. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू जणू त्याच्याकडून झालेल्या अक्षम्य चुकांची साक्ष पिर्याला देत होते. सर्व जगाला जणू ते दिघे बाप-लेक विसरून गेले होते.
आजूबाजूच्या लोकांच्या भुवया तोपर्यंत उंचावल्या गेल्या होत्या. एका उच्चवर्णीयाने एका अस्पृश्याला स्पर्श केला होता. सर्वांनी एकाच गलका करत म्हादबाला झोडपण्यास सुरुवात केली.आजपर्यंतचा अस्पृश्यांवरील सर्व राग म्हादबा वर निघाला. त्यामुळे प्रत्येक उच्चवर्णीय त्वेषाने म्हादबाच्या अंगावर धावून गेला. हातात सापडेल त्याने म्हादबावर राग काढण्यात आला.म्हादबा रक्ताच्या थारोळ्यात पडला, तरीही त्याच्यावरील लोकांचा राग कमी होईना.आणि एकदाचा म्हादबा निपचित पडला व जागीच गतप्राण झाला. त्या भाउगर्दीत पिर्या कधीच बाजूला भिरकावला गेला होता.म्हादबा हालचाल करीत नाही हे पाहिल्यावर लोक बाजूला झाले आणि पिऱ्या बाबा-बाबा, बाबा-बाबा चा टाहो फोडत  म्हादबाकडे सरकत सरकत आला. आणि बाबा$$$$$$$$$$$ अशी मोठी आरोळी मारत पिर्याही तेथेच कोसळला......
पिंपळाचे झाड कोठेही उगवत,
कोठेही उगवत म्हणून त्याच कसाही निभावत.
कथाकथन संपले होते. सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले होते. संपूर्ण हॉलमध्ये निरव शांतता पसरली होती. कोणालाही काही सुचत नव्हते, सार्वजन माझ्याकडे अनिमिष नजरेने बघत होते. मीही स्टेजवर तसाच उभा होतो. यापुढे काय झाले कुणालाच काही काळात नव्हते. पिर्याच्या बाबतीतला प्रश्न अनुत्तरीत ठेऊन मी फक्त चारोलीने हिंट दिली होती व स्टेजवरून खाली उतरू लागलो. टाळ्यांचा कडकडत झाला. तो थांबवण्यासाठी संयोजकांना दोनदा सूचना द्याव्या लागल्या. माझ्या कथाकाथानाला प्रेक्षकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला. माझ्या कथाकाथानाला पहिले पारितोषिक मिळाले वेगळे सांगायला नको.
पिंपळाच्या झादाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, आणि या पिंपळाच्या झाडणे मलाही आज माझी ओळख निर्माण करून दिली. यापेक्षा अजून काय...........

................................डॉं. आविनाश लांडगे (सांगाती) 

No comments:

Post a Comment