Wednesday, January 6, 2016

जगाच्या रंगमंचावर....

जगाच्या रंगमंचावर.... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)    
काही प्रश्न माझ्या मनात काहूर घालताहेत. बघतो जमताहेत का कागदावर उतरवायला. तसे बरेचशे असे प्रश्न तुम्हालाही पडलेले आहेत. फक्त माझ्या माध्यमातून ते कागदावर येताहेत एवढाच काय तो फरक. सर्वप्रथम आणि स्वाभाविक प्रश्न प्रत्येकाच्या जीवनात असतो. आणि तो जीवनाबद्दलच असतो. किती गम्मत! जीवनामध्येच जीवनाबद्दल प्रश्न? किती अफलातून आहे सगळं....... प्रश्न येतातच मुळी जेव्हा अडचणी येतात, पराभव होतात, विजय होतात, मग त्यामागची कारणमीमांसा लिहिली जाते..... अध्यात्मिक भाषेत सांगायचे तर चिंतन केले जाते, राजकीय भाषेत विजयाचा जल्लोष केला जातो. मनातल्या मनात प्रश्नांची मालिका सुरु होते......... मनच मनाला समर्पक उत्तरे देऊ लागते....... अमुक एक कृती चूक कि बरोबर या तराजूत तोलली जाते. ..... त्या त्या कृतीला चूक किंवा बरोबर ठरवण्यासाठी पुष्ठी, पुरवणी घटना, कृतीचे दाखले दिले जातात. आणि प्रकरणावर पडदा पडतो. अर्थात हा सर्व खटाटोप समोरचा चूक कसा आणि मी बरोबर कसा या विषयावरच चालू असतो. आलेले निष्कर्ष किती बरोबर, आहेत याची पडताळणी बहुदा होत नाही. कारण कोणतीच गोष्ट बरोबर किंवा चूक नसते. हे फक्त मनाचे मनाला समजावणे चालू असते.
समाजामध्ये घडणाऱ्या कित्येक घटना आपण पाहतो. खरेच या घटनांचे खरे रूप आपल्यासमोर येत असेल का? बहुदा त्या ‘सु’रुपात आपल्या समोर येत असाव्यात. कारण या घटनेमधून समाजाला काय संदेश जाईल यावर जास्त भर दिला जात असावा व त्या पद्धतीने त्या विशिष्ट घटनेची मोडतोड करून त्या सर्व घटनेमध्ये हे चूक हे बरोबर चे मुलामे देवून टी घटना सदर केली जात असावी असा माझा प्राथमिक अंदाज आहे.
देशाच्या दक्षिण प्रांतात म्हणे रावणाला पूजतात....... का बरं असेल असे?..... बराच विचार केला या प्रश्नावर आणि फक्त एकाच निष्कर्षावर पोहोचलो....... जो जिता वही सिकंदर..... झुकती ही दुनिया झुकानेवाला चाहिए...... जो जिंकतो त्याचा इतिहास लिहिला जातो.त्यासाठी घटना किंवा कृती कशी बरोबर किंवा चूक याकडे लक्ष वेधण्यासाठी दाखले देणे आले. आणि कुणी तरी एक हिरो आणि एक विलन म्हणून प्रस्तावित होईल. अशा प्रकारे त्याचे अनुयायी बनतील. बरोबर ना!......... याचाच दुसरा अर्थ असाही होतो जर का राम आणि रावण यांच्या भांडणात रावण जिंकला असता तर कदाचित एखाद्या रावण भक्ताने ‘रावणायन’ लिहिले असते. आणि राम कसा चुकीचा होता, याने सीतेला वनवासात न्यायला नको होते, लक्ष्मणाने शुर्पनखेची छेड काढायला नको होती (रावणाच्या बाजूनेचा अर्थ) किंवा लक्ष्मण शुर्पनखेला  समजावूनही शकत होता, सीताच कसी दुर्दैवी होती, सितेमुळेच रामाच्या वाटयाल वनवास कसा आला, रामाचे हे दुर्दैव घालाविण्यासाठीच रावणाने सीतेचे अपहरण कसे केले....... वगैरे ... वगैरे...... झाले असते का असे? तुम्हाला काय वाटते?...
माझ्या लेखनामध्ये व्यत्यय आला .... थांबतो थोड्या काळासाठी ... पुन्हा कधीतरी लिहील या विषयावर.. पुढचे बंडखोर विचार लिहायला मन धजेना..... काय होतंय माहित नाही हे सर्व लिहायला मन अजून तयार नाही. जेव्हा मी पूर्णपणे तयार होईल तेव्हा माझ्या तुमच्या मनातला कोलाहल सप्रमाण कागदावर येईलच ... बोलूयात पुन्हा कधीतरी या विषयावर ........ तोपर्यंत बिंदू शोधत रहा....


(११.१२.२०१५)

No comments:

Post a Comment