जागल्या
.... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)
काळ परवा सहज न्यूज च्यानल सर्फिंग करत असताना एक आशावादी बातमी झळकली. जळगाव
जिल्ह्यातील पारोळा गावातील काही विद्यार्थी (ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केल्या
होत्या) गावागावात जाऊन दिंडी रूपाने प्रबोधन करत आहेत. माझ्या मनाला हि गोष्ट
चटकन भावली. अर्थातच मीही शेतकऱ्याच पोर आहे. नेहमीच्या सवयीने त्या गोष्टीवर मनात
मंथन सुरु झाले. आत्महत्या करणे वाईटच...... त्याबद्दल मतभेद असण्याचे कारण नाही.
पण का होत असतील आत्महत्या !... आत्महत्या रोखण्यासाठी असा उपक्रम वारकरी
संप्रदायाने हाती घेणे नक्कीच अशादायी आहे. नव्हे, भूतकाळात हे काम याच
संप्रदायाने नेटाने लावून धरलेले दिसून येते. आपले भविष्य नेहमीच आशावादी,
ध्येयवादी ठेवावे, त्यामुळे जगण्यासाठी उर्जा मिळते. हा आशावाद संत साहित्याने व
वारकरी संप्रदायाने नेहमीच प्रफुल्लीत ठेवण्याचे काम केले आहे.
माझ्या लहानपणी आमच्या गावात भराडी म्हणून एका जमातीचे लोक येत असत. तसे हे
लोक वर्षातून फक्त एकदाच येत. त्यात भराडी, नंदीवाले, वासुदेव अशी मंडळी असत. या
सर्वांबद्दल गावकर्यांमध्ये कमालीची आपुलकी दिसून येत असे. एक चम्पाभर (आठवाभर) धान्य
मग ते कोणते का असेना हे लोक प्रत्येक घरातून गोळा करत असत आणि बदल्यात
वर्षभरासाठीच आशावाद प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात जागवून जात (सर्वांचे भविष्य
सांगण्याचे काम करत). म्हणून त्यांना दिलेले ‘जागल्या’ हे नाव यथायोग्य आहे असे
मला वाटते. त्यातल्या भराडी मंडळीवर माझे विशेष लक्ष असे.
अंगाने उंचापुरा, रुंद छाती, खांदे मजबूत, मिशांना सतत ताव मारण्याची सवय, जड
भुवया, डोक्यावर फेटा पायात मेंधापालांकडे असतात तशा जड जड चपला, असा नजरेत भरणारा
पेहराव या भराडी बुवांचा असे. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची सवय त्यामुळे तो खोट
बोलतच नाही मुली असा प्रत्येकाचा विश्वास. डोळ्याला डोळे भिडवून बोलण्याच्या व
आवाजातील करडेपणा मुळे समोरचा लगेच संमोहित होई. मध्येमध्ये तुळजाभवानी व अंबाबाई
च्या नावाचा जयघोष चालू असे. ५०-६० किलो धन्य तो दिवसाकाठी जमवत असे आणि ते त्याचे
भक्कम खांदे हे सर्व उचलण्यास अर्थातच समर्थ होते.हा नेहमी पायी फिरे. त्यामुळे
त्याच्या जाड जाड वाहणा त्याला नेहमी साथ देत असत. काळानुरूप तो नंतर सायकलवर येऊ
लागला होता.
माझ्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य होतेच. मजुरी शिवाय पर्याय नव्हता. वडील
नेहमी मजुरीसाठी दुसर्याच्या बांदावर उभे. अर्थातच त्यामुळे आलेले नैराश्य कधीकधी
मुलाबाळांवर निघे. ....... आणि मग आईलाही या गोष्टी नकोशा होत. काय आहे
जगण्यामध्ये. असच’ मरणार का आपण. आणि नेमका अशाच वेळी वरील पैकी एखादा जागल्या
येऊन हि आशावादाची ज्योत पेटवत असे.
नेमके नाव आठवत नाही पण शांताराम किंवा सखाराम तत्सम काहीतरी नावाचा हा भराडी
आमच्याकडे उन्हाळ्याच्या सुटीत येत असे. मग घराच्या ओट्यावर बसून “आहे का कुणी घरात, माझा वाट घ्यायला आलोय” अशी हाक तो मारत असे. नेहमीप्रमाणे चम्पाभर (आठवाभर) धान्य घेवून आई बाहेर
येई आणि त्याच्या झोळीत ओतत असे आणि आम्हा मुलाना घेऊन अंगणात बसत असे. हा भराडी
मग वर्षभराचे भविष्य सांगण्यास सुरुवात करत असे. त्यात वडिलांबद्दल कोद्कौतुकाचे
काही वाक्य असत.
मालक तुमचे खूप तापत माई
राग आल्यावर सहन होत नाही
कष्ट करायला रावण हाय
पण खोट कधी सहन होत नाय
वडील कधीतरी शेजारी
बसलेले असत मग तो म्हणे
लई
मोठ मन हाय तुमच भाऊ
लोक फायदा घेतात तुमचा भाऊ
आयुष्यात लई कष्ट केले तुम्ही भाऊ
कुणाबद्दल वाईट चिंतीत नाय तुम्ही भाऊ
पण तुमच्याविषयी वाईट करत्यात लोक भाऊ
पैसा लई कामावतेत तुम्ही भाऊ पण पैसा टिकत नाय
लई मेहनत करून काम होत नाय भाऊ
तोंडापाशी आलेला घास निघून जातोना भाऊ
देवावर लई श्रद्धा आहे तुमची भाऊ
पण देवाबद्दल तक्रार बी हाय तुमची भाऊ
पण येच्यात देवाचा देवाचा दोष नसतंय भाऊ
नशीब लई जोरात हाय तुमच भाऊ
सुख समाधान अन बक्कळ पैसा
लिहून ठेवलाय देवान भाऊ
लाथ मारणार तिथ पाणी काढणार तुम्ही भाऊ.......
मग आईकडे वळून “यंदा पाउस पाणी चांगला हाय माई. पुढच्या वर्षी
अंगणात फटफटी (मोटारसायकल) दिसणार मला. आणि हे जर का खोट झाल तर हा सखाराम मिशीवर पिळ
मारायचा बंद करेल माई”......
शेवटची फटफटी ची आशा लाऊन सखाराम उठत असे आणि भेटू परत पुढील वर्षी असे म्हणे.
जाता जाता आई उगाचच हा माझा मोठा मुलगा म्हणून माझा हात त्याला दाखवी. “मुलाच्या हातातील धनरेषा गुप्त आहे (धनरेषा नाहीच माझ्या हातात) ती दिसत नाही.
धनरेषा गुप्त आहे माई, गंगेच पाणी आटलं पण या पोराच्या हातातील पैसा कधी आटणार
नाही. याच भविष्य फार उज्ज्वल आहे असे म्हणून सखाराम निघून जाई.
असा काही उत्साह संचारे सर्व घरात, घरातील सर्व नैराश्य त्या सखारामच्या
येण्याने झात्खून जाई. पुढील वर्षी फटफटी येणार या कल्पनेने सर्व घर दुप्पट
उर्जेने कामाला लागे. अशी महिने दोन महिने जात नाही कि पुन्हा कुणीतरी असाच
जागल्या पुन्हा एकदा संपूर्ण घराला जागे करण्यासाठी येई. यावेळी मात्र गोष्ट वेगळी
असे. ‘सध्या साडेसाती चालू आहे, कोणत्यातरी ग्रहाणे कोणत्यातरी ग्रहावर आक्रमण
केले आहे. थोडे सबुरीने घ्यावे लागेल असा उपदेश करून हा निघून जाई.
माझ्या आठवणी नुसार साधारण नारा वर्षे अशीच पुढच्या वर्षी फटफटी नक्की. या आशेवर
आईने कष्ट सोसले. बाराव्या वर्षी मात्र आईचा बांध फुटला. आणि ती त्या जगल्यावर
ओरडली. “काय खोट बोलतोस, दरवर्षी सांगतोस पुढच्या वर्षी फटफटी नक्की फासिवातोस व्हाय
रे मला भाबडीला. जा तू बोलू नकोस माझ्याशी”. आतापावेतो एवढ्या वर्षाचा ऋणानुबंधाने जागल्या
देखील घराशी जोडला गेलेला असतो. घरातील सर्व सुख दुःख त्याला माहित झालेली असतात.
गावातील भावकी सह सर्व इत्यंभूत माहिती त्याला या न त्या मार्गाने मिळालेली असते.
कोणी कोणाल कसा त्रास दिला वगैरे त्याला माहित असते. आईच्या या बोलण्याने
त्याच्याही डोळ्यात पाणी आले. पण हा भराडी मला
भावला तो एका गोष्टीमुळे, त्याने हर मानली नाही. तो पुढे म्हणाला, “माई, तू माझ्या बहिणीसारखी, बारा वर्षापूर्वी तुझा हात जेव्हा मी पहिला
तेव्हाच जीभ चाच्रली माझी. बारा वर्षाची कमी अधिक साडेसाती होती तुम्हाला, याच
वर्षी टी संपली. मुलाचे शिक्षण संपले आहे आता सुगीचे दिवस सुरु झालेत. निराश होऊ
नकोस, तुझ्या सोन्यासारख्या दिवसांच्या जवळ तू पोहोचली आहेस. थोडी कळ सोस.यंदा
धान्याच्या राशीनी खळ भरून जाईल. तुझी कोणती म्हणून कोणती तक्रार राहणार नाही.” पुन्हा एकदा दुर्दम्य आशावाद आईच्या मनात जागवण्यामध्ये हा यशस्वी झालेला
असे. जाताना मात्र या वेळी या वर्षीचे धान्यही पुढील वर्षीच घेऊन जाईल असे म्हणून
तो दिसेनासा झाला. पुढील वर्षी वडिलांनी जुनी का होईना एक राजदूत मोटारसायकल विकत
घेतली. आईच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आयुष्याचे चीज झाल्यासारखे
वाटले तिला.
अगदी हेच काम वारकरी संप्रदायानेही केले. दरवर्षी गावात असणाऱ्या अखंड हरीनाम
सप्ताहात कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांनी शेतकरी जनतेमध्ये सचोटीची, चिकाटीचे व
सबुरीचे बीज रोपण केले, याच आशावादावर शेतकरी तरला, जगला. दुःखाचे दिवस जातील,
सुखाचे दिवस नक्की येतील पुढील वर्षी हरीनाम सप्ताहात यावर्शिपेक्षा दुप्पट देणगी
या कार्यक्रमासाठी जमा होणार आहे. कारण हे क्षेत्र एक पुण्यक्षेत्र म्हणून उदयाला
येणार आहे धनधान्य कधीच कमी पडणार नाही याची मला खात्री आहे असा आशावाद जागवून
काल्याचे कीर्तन संपत असे आणि संपूर्ण गाव चैतन्यमय होऊन जाई. नव्या जोमाने कामाला
लागे. गावातील एकीचे दर्शन त्यावेळी होई. गावात आडल्या नाडल्या साठी संपूर्ण गाव
धावून जात असे. ‘संपूर्ण गाव एखाद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे म्हटल्यावर काय
हिम्मत आहे कोणाची आत्महत्त्या करण्याची. नव्हे तसा विचार सुद्धा कोणाच्या मनाला
शिवणार नाही’.
कीर्तनकाराचा एक विश्वासाचा शब्द व आशावाद सर्वांना एकत्र बांधून ठेवायचा आणि
म्हणून ‘मी वेगळा माझ दुःख वेगळ’ असा विचार सुद्धा कोणाच्या मनाला शिवत नसे. त्या
साठी आत्महत्या हि तर फार दूरची गोष्ट.
मग आता काय बिघडलय! का करतात लोक आत्महत्या. काळानुरूप चित्र बदलले, काहीतरी
घोळ केला या नवीन पिढीने..... सगळाच घोटाळा होऊन बसलाय .....
(२६ जाने.२०१६)
No comments:
Post a Comment