आनंदाचे क्षण
आनंदाचे क्षण तसे लक्षात रहात नाहीत हल्ली.
बऱ्याचदा आयुष्य खाच खळग्यातून बाहेर आलेले
असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेली दिव्ये तेवढी लक्षात राहतात. अर्थात
त्यामधून मिळालेले यश हा आनंदाचा क्षण असू शकेल. पण तो निखळ आनंद नव्हे. ते जे
काही असेल ते काहीतरी प्राप्तीचा ढेकर असेल बहुदा.
आनंदाची व्याख्या माझ्या दृष्टिकोनातून फार
वेगळी आहे. आनंद असा जो निखळ असला पाहिजे. तो कशात मोजलाच जाऊ शकत नाही. कारण
मोजमाप आले म्हणजे तुलना आली. आनंदाची तुलना करता येऊ शकते? आणि जर तुलना होणार असेल तर तो आनंद
आहे का? म्हणजे असे बघा की मी आज कालच्यापेक्षा
आज जास्ती आनंदी आहे. याचा अर्थ असाही होतो की तुम्ही काल आजच्यापेक्षा दुःखी
होतात. म्हणजेच आनंदी नव्हता. म्हणून म्हटले की आनंद ज्या वेळी निखळ असेल तेव्हाच
त्याची तुलना होणार नाही. कारण तो निर्लेप असेल, प्रांजळ असेल,
निष्पाप असेल आणि जमलाच तर निरंतर आणि चिरंतन असेल.
माझ्या आयुष्यात असाच एक आनंदाचा क्षण येऊन
गेलेला आहे.
त्याचे वर्णन जसे जमेल तसे करण्याचा प्रयत्न
करतो. प्रसंगचं इतका छान आहे की त्याचे वर्णन करताना सुद्धा मला आनंदाची प्रचिती
येते.
तुमच्या आयुष्यात, स्वतःपेक्षा जास्त विश्वास दुसरा कुणी
आपल्यावर दाखवला, असा कधी प्रसंग आलाय का हो?
पदव्युत्तर शिक्षण घेऊन मी नोकरीला अर्थातच
तात्पुरत्या स्वरूपाच्या लागलो होतो. पहिली नोकरी बारामती येथे तुळजाराम चतुरचंद
कॉलेजला केली. खूप चांगले महाविद्यालय आहे ते. आजही कोणतीही लाच न देता नोकरी
मिळते तेथे. एक वर्ष काम संपवून मग मी रिसर्च असिस्टंट म्हणून जळगावच्या मूळजी
जेठा महाविद्यालय येथे प्रा. डॉ. गौरी राणे यांच्याकडे काम करू लागलो. खानदेशातील मातीमधील कवकांचा
अभ्यास असा तो विषय होता. मॅडम चा स्वभाव शिस्तप्रिय असल्याने मला माझ्या
आयुष्यातील खरी शिस्त येथेच म्हणजे मु. जे. महाविद्यालयात लागली.
शिस्तप्रिय असल्या तरी मॅडम खूप प्रेमळ होत्या.
आईची माया दिली त्यांनी. पण कामामध्ये मात्र त्यांना अजिबात कसूर चालत नसे. दिवसभर
सूक्ष्मदर्शकाखाली मान धरून ती दुखत असे. पण ते सांगण्याची सोय नाही अशी काही
परिस्थिती. पण समर्पण कशाला म्हणतात ते तिथे कळले. दिवसभर मातीचे नमुने गोळा करणे
आणि त्यामधून कवकांचे विलागिकरण करणे, त्यांची
प्रयोगशाळेत वाढ करणे असे काम चाले. एकटा जीव सदाशिव असल्याने माझी राहण्याची सोय
मुलांच्या वसतिगृहात केली होती. पदवी चे शिक्षण
घेणारे विद्यार्थी त्या वसतिगृहात राहतं होते.
त्या वस्तीगृहाच्या एका खोलीत मला या त्रियींची
भेट झाली. मनोज आणि आणखी तिघे. अर्थातच संध्याकाळी मी मोकळा
असल्याने आणि भोजनालायत भोजन करताना यांची भेट झाली.
पाणी आणण्यासाठी म्हणून प्रत्येकाची पाळी
लावण्यात ही मंडळी व्यस्त होती. त्यात एकेकाचे तर्क चालू होते. मी लांबून त्यांची
मजा पाहत होतो. आणि प्रत्येकाने लावलेल्या तर्कावर विचार करत होतो.
निष्णात वकिलाला शरण येण्यास भाग पाडतील असे तर्क एकेक जन लावत होता. कशासाठी तर
पाणी आणायला लागू नये म्हणून.
अशी ही
ओळख नंतर मैत्रीमध्ये परिवर्तित झाली.
मग प्रत्येक वीकएंड चा चित्रपट आम्ही पाहू
लागलो.
बऱ्याचदा पैसे नसल्याने आमच्यातील एकजण सिनेमा पाहून
येत असे व त्याच्या रेटिंग नुसार बाकी जनता सिनेमा पाहण्यास जात असे.
मैत्रीची वीण घट्ट होत गेली. पण मैत्री किती
घट्ट हे फक्त एखादा प्रसंगच ठरवू शकतो. तो प्रसंग संकट बनून मैत्रीची परीक्षण करत
असतो. झालेही असेच काहीसे....
रविवार चा दिवस होता. त्यात जळगावच ऊन... एप्रिल
महिन्याचे दिवस होते. कपडे ओले करून अंगावर घेऊन झोपले तरी अर्धा तास खूप होई
कापडे वाळण्यासाठी.
भोजनालयात
फारसे चांगले जेवण न मिळाल्याने कि सुटी असल्याकारणाने भूक लागली होती. आम्ही दुपारी काहीतरी खायला आणू असे म्हणून
बाहेर पडलो.
थोड्या अंतरावर आम्हांला अननस विकणारा एक
हातगाडी वाला भेटला. या एवढ्या उन्हात अजून काही भेटण्याची शक्यता फार कमी
असल्याने आम्ही जे भेटेल ते पदरात पाडून घेण्याचे ठरवले.
आणि साधारण तीस की चाळीस रुपये किंमत ठरवून आम्ही ते अननस घेऊन वसतिगृहात आलो.
काहीतरी जुगाड करून आम्ही ते अननस कापले आणि
काय हे?
अननस चक्क सडके निघाले. आता मात्र राग अनावर होत चालला होता. एक तर उन्हातान्हात
गेलो चाळीस रुपयेही गेले आणि सडके अननस. माझा राग जरा जास्तच अनावर झाला. मी ते
अननस घेऊन थेट त्या ठेल्यावर गेलो आणि त्याच्याशी भांडू लागलो.
एव्हाना मनोज आणि बाकी मंडळी माझ्या मागोमाग
आली होती.
पण तो फेरीवाला काही ऐकत नव्हता. मी त्याला
पोलिसात जाण्याची धमकी दिली. तरी तो ऐकेना. अचानक माझ्यातला क्रांतिकारक जागा झाला
आणि मी हा अन्याय सहन करणार नाही वगैरे विचारांनी प्रेरित होऊन मी माझ्या
देशबांधवांना (माझ्या मागे आलेल्या मुलांना) माझ्याबरोबर पोलीस ठाण्यात येण्याचे
आवाहन केले. नेमके इथेच अर्धे बांधव माघारी पळाले (चाळीस रुपयाचे अननस साठी काय
पोलिसात जायचे वगैरे विचार असतील त्यांच्या मनात बहुदा). पण मनोजसह अजून काही जनता
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती की! मग ते सडलेले अननस घेऊन आम्ही पोलीस
स्टेशनात निघालो. पोलीस स्टेशन येईस्तोवर राहिलेली जनता कधी गळून गेली कळलेच नाही.
पोलीस ठाण्याच्या दारात उभा होतो मागे वळून पाहतो तर फक्त मनोज एकटाच माझ्या मागे.
मी तसाच आवंढा गिळत पोलीस ठाण्यात गेलो आणि
डायरेक्ट सिनिअर पोलीस निरीक्षक यांना भेटलो. मनोजसह माझीही
पोलीस ठाण्यात जाण्याची पहिलीच वेळ होती. सिनेमासारखं पोलीस आपल्याला दाद देणार
नाही असे वाटले होतें पण निरिक्षक साहेबांनी अपुलकीने विचारणा करून प्रकार समजून
घेतला व त्या फळ विक्रेत्यास बोलावले. फळ विक्रेता घाबरतच आला व अदबीने उभा राहिला.
विचारणा झाल्यावर तो सांगू लागला, साहेब मी काय अननस मध्ये शिरून पायलंय व्हय. असे खराब निघालेलं अननस
बदलून देत बसलू तर पोरबाळांना काय खाऊ घालू.
एव्हाना माझाही राग शांत झाला होता. मी पण
प्रसंग जास्त न ताणता त्यावर पडदा टाकणे योग्य समजले.
मात्र या प्रसंगाने एक खूप मोठा आनंद माझ्या
आयुष्यात आला. एक सच्चा मित्र मिळण्याचा आनंद. जेव्हा कुणीच तुमच्या बाजूने उभे
राहायला धजावत नाही तेव्हा तुमच्या सोबत असलेल्या माणसांची संख्या मोजा. ते खरे
मित्र. हा निखळ आनंदाचा ठेवा मला मनोज च्या रूपाने भेटला आणि तो निरंतर आणि चिरंतन
पणे तसाच खळाळत आहे या पेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. किशोर सुलभ मतांच्या
जाळ्यात न अडकता तोही प्रथमच मजसवे पोलीस
ठाण्यात आला होता. तोही खूप घाबरला होता पण तो लटलटत का असेना माझ्या बाजूला उभा
होता. आपल्या पेक्षा जास्त आपल्यावर कुणीतरी
विश्वास ठेवतय हि फीलिंग लईच भारी असते. आणि त्यातून जो आत्मविश्वास वाढतो त्याची
मोजदाद कोणत्याच परिमाणा मध्ये करणे शक्य नाही. म्हणूनही तो आनंद मोठा. हाच
खरा आनंदाचा क्षण मी समजतो.
अशा या आनंदाची तुलना होऊ शकत नाही. हा काल
पेक्षा अधिक किंवा उद्या पेक्षा कमी असे काहीच होऊ शकत नाही म्हणून हा आनंद आहे
निर्भेळ,
निखळ, निरंतर
लक्षात राहणारा आणि आयुष्यात अजून एक पाठ शिकवणारा.
परिवर्तन जळगावचे आभार त्यांनी मला
माझ्याच आयुष्याची आनंदाची सफर घडवलीत म्हणून.
धन्यवाद..
मी
आपणास आवाहन करतो,
परिवर्तनच्या विविध उपक्रमासाठी सबस्क्राईब करा
परिवर्तनचं युट्युब चॅनेल
https://www.youtube.comll/channel/UCvmsOWIXxS-lIuzpwRw1JNQ
https://www.facebook.com/parivartan.jalgaon/